नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्ष देशातील लोकांची व महिलांची संपत्ती ओरबाडून ती मुस्लिमांना देणार आहे आणि कॉंग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात असे वचन दिले आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीरसभेत केले आहे. त्याला काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी कडाडून आक्षेप घेतला आहे.
कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचा आणि त्यात ही ओळ कुठल्या पानावर आहे ते स्पष्ट करा अन्यथा माफी मागा असे आव्हान तिवारी यांनी मोदींना दिले आहे. भारताचे पंतप्रधान त्यांच्या पदाची प्रतिष्ठा विसरतात आणि निवडणुकीच्या वेळी ते जे काही बोलतात ते माजी पंतप्रधान, आणि संविधानाचा अपमान असतो असे ते म्हणाले.
पराभवाच्या भितीने त्यांनी पुन्हा हिंदु-मुस्लिम विषय सुरू केला असून त्यांच्यासाठी हा विषय म्हणजे ऑक्सिजन सारखा असला तरी यावेळी हे खरे ठरणार नाही. त्यांनी माझे आव्हान स्वीकारावे; अन्यथा, त्यांनी देशाची माफी मागावी असे त्यांनी नमूद केले. अशा खोटारडेपणाबद्दल देशातील मतदारांनी त्यांना शिक्षा करावी असे आव्हानही त्यांनी दिले. कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांबरोबरच इंडिया आघाडीच्या अन्य नेत्यांनीही मोदींच्या या आरोपावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.