देऊळगावराजे, (वार्ताहर)- दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगावराजे, पेडगाव, वडगावदरेकर शिरापूर, हिंगणीबेर्डी, मलठण, वाटलूज, नायगाव येथील भीमा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिसरातील तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली शेती पीके देखील धोक्यात आली आहेत, देऊळगावराजे, पेडगाव, खोरवडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाण्याची तळी साचली आहेत आहेत. ते जेमतेम पंधरा दिवस पुरेल अशी परिस्थिती आहे. भीमा नदी कोरडी पडल्यामुळे आता येणाऱ्या हंगामातील पिकांची लागवड देखील शेतकऱ्यांनी थांबवली असल्याचे चित्र आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणी संपत आल्याने आता पिकांना पाण्याची गरज असताना नदीला पाणी नसल्यामुळे पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. नदीला पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी देखील कमी झाले आहे. गेल्या वर्षी खडकवासला परिसरात पाऊस कमी झाल्यामुळे परिणामी उजनी धरण अवघे ६१ टक्के भरले होते.
याच धरणाचा फुगवटा दौंड तालुक्यातील पूर्व भागात येतो. याच पाण्यावर परिसरातील शेती अवलंबून आहे. पण उजनीतून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे केवळ पाच महिन्यांत धरण सध्या मायनस ३५ टक्के झाले आहे, परिणामी परिसरातील उजनी धरणाची पाणी पातळी खालावली आहे.
पिकांना जीवदान तरी द्या
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे. याचाच फटका वडगावदरेकर, पेडगाव, आलेगाव, देऊळगावराजे, हिंगणीबेर्डी, मलठण वाटलूज, नायगाव, राजेगाव येथील शेतकऱ्यांना बसला आहे.
आत्ता सध्या तरी पिकांना जीवदान मिळावे, अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई बघता भीमा नदीकाठच्या गावांची यातून सुटका व्हावी म्हणून नदीत पाणी सोडण्याची मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती. त्यावेळी यावर चर्चा होऊन त्याला प्राथमिक मान्यताही मिळाली होती.
आता पुढच्या काही दिवसात हे पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत मागणी केली होती. त्यानुसार या पाण्याचा दौंड तालुक्यालाही फायदा होणार आहे. पण कोणताही भेदभाव न करता हे पाणी माझ्या मतदारसंघातील औटेवाडीपर्यंत येईल, याची काळजी घ्यावी. – रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड.