पुणे, दि. 4 -जलसंपदा विभागाने यंदा हवामानाचा अंदाज घेऊन आधीच धरणांमधून टप्प्याटप्प्याने नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली. यामुळे धरणांमध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी साठविण्यास वाव मिळाला. परिणामी धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्याची गरज पडली नाही. तसेच शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही.
हवामान अंदाज आणि जलसंपदा विभागाच्या योग्य नियोजनामुळे यंदा शहर आणि परिसरात पूरस्थिती ओढवली नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरल्यानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हवामानाचा अंदाज घेऊन आधीपासूनच मुठा नदीत पाणी सोडण्यात आल्याने मुसळधार पाऊस पडूनही धरणांमधून मर्यादित पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी शहरातील नदीपात्रालगतच्या नागरी भागात पाणी शिरण्याच्या तुरळक घटना वगळता मोठी हानी यंदा झालेली नाही. यंदा खडकवासला धरणातून सर्वाधिक विसर्ग हा 30 हजार क्युसेक इतका करण्यात आला होता.
याबाबत बोलताना जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले म्हणाले, “”शहर व परिसरात पूरस्थिती येऊन नुकसान होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षांत कमी वेळात जास्त पाऊस होत आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असली आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यास मोठ्या प्रमाणात धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. परिणामी नदीकाठच्या भागाला त्याचा फटका बसतो. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हवामानाचा अंदाज घेऊन आधीच धरणांमधून टप्प्याटप्प्याने नदीत पाणी सोडण्यात येते. यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याची गरज राहत नाही.”