पंचगंगाने धोकापातळी ओलांडली ; राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले
कोल्हापूर (प्रतिनिधी) – चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील असणाऱ्या घाट परिसरात आणि धरणक्षेत्रातील पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीवर वाहात आहे.
जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे बंद झालेले दोन दरवाजे पुन्हा उघडले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे समूह पूर्वस्थिती गंभीर होण्याची समस्या निर्माण झाली आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. धरणाचे चारपैकी दोन दरवाजे बंद झाले होते. मात्र 3 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे पुन्हा उघडले असून चारही दरवाजांमधून 7112 क्युसेक जलविसर्ग सुरू आहे. दरम्यान, चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात दरड कोसळली आहे.
भोगावती नदीचे पाणी बालिंगा पुलाशेजारी रस्त्यावर आल्याने तसेच लोंघे व मांडुकली येथे रस्त्यांवर पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंद आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महार्गावरही केर्ले, आंबेवाडी या ठिकाणी पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी शिवाजी पूल येथून बंद असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पवार पाणंद येथेही पाणी आल्याने कोल्हापूरहून वडणगेकडे जाणारा मार्गही बंद करण्यात आला आहे. प्रयाग चिखली येथील संगमस्थळी असलेल्या पुलावरही पुराचे पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे.
रुई येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. उजवी बाजुकडील गणपती मंदीराला या पाण्याने वेढले आहे. हळदी येथे पुराचे पाणी आल्यामुळे कोल्हापूर ते राधानगरी रस्ता हळदी येथे बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 79 बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्याची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 9 मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.