पर्दाफाश सभा घेण्याचाही दिला इशारा
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासावर चर्चा करण्याबाबत दिलेले आव्हान कॉंग्रेसने स्वीकारले आहे. एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्री चर्चेस राजी न झाल्यास पर्दाफाश सभा घेण्याचा इशाराही कॉंग्रेसने दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. त्या यात्रेचा प्रारंभ करताना त्यांनी विकासावर चर्चा करण्याचे आव्हान विरोधकांना दिले. युती सरकारने मागील कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारांपेक्षा दुप्पट कामगिरी करून दाखविली असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचा संदर्भ देत प्रदेश कॉंग्रेसचे प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान पक्षाने स्वीकारले असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी तारीख आणि वेळ सांगावी. त्यांनी ते केले नाही तर आम्ही पर्दाफाश सभा घेऊ. यात्रेदरम्यान मुख्यमंत्री जिथे जातील; तिथे आम्ही त्या सभा घेऊ. त्या सभांमधून युती सरकारचे अपयश उघड करू, असे ते म्हणाले.
कृषि, जलसिंचन क्षेत्रांबरोबरच शहरी विभागाच्या विकासासाठी, बेरोजगारी हटवण्यासाठी तसेच आदिवासी, मागासवर्ग, अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी सरकारने कार्य केले असते; तर मुख्यमंत्र्यांवर यात्रा काढण्याची वेळ आली नसती, असा शाब्दिक टोलाही पटोले यांनी लगावला.