शहराबाहेर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय
71,496 प्रवासी बाहेरगावी गेले
पुणे – करोनामुळे स्थगित झालेली विमानसेवा दि.25 मे पासून पूर्ववत झाली. यानंतर हजारो भारतीय मायदेशी परतले. मात्र, लोहगाव विमानतळाहून पुण्यात येणाऱ्यांपेक्षा शहराबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे चित्र आहे.
लोहगाव विमानतळावरून जयपूर, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, बेंगलोर, कोची आदी शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली. त्यामुळे दररोज सरासरी 30 ते 40 विमानांची दररोज ये-जा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 25 जूनपर्यंत सुमारे 1,200 हून अधिक विमानांचे “टेकऑफ’ आणि “लॅन्डिंग’ झाले. याद्वारे 41,530 प्रवासी पुण्यात दाखल झाले. तर 71,496 प्रवासी शहरातून अन्य शहरांत रवाना झाले, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
22 हजारांहून अधिक नागरिक दाखल
“वंदे भारत’ अभियानातून परदेशात अडकलेल्या नागरिकांना मुंबईत उतरवून घेण्याची आणि त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केली. आतापर्यंत 145 विमानांतून तब्बल 22,251 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये 8 हजार 70 प्रवासी मुंबईचे असून, उर्वरित महाराष्ट्रातील 7 हजार 686 प्रवासी आहेत. याशिवाय अन्य राज्यातील 6 हजार 495 प्रवाशांचा समावेश आहे. तर तर 1 जुलैपर्यंत आणखी 26 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तेथे संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. तेथून अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांना संबंधित जिल्हा मुख्यालयांमध्ये पाठवले जात आहे. प्रवासी संबंधित जिल्ह्यात गेल्यानंतर स्थानिक जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाइनबाबत सूचना देण्यात येत आहेत.