नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत शनिवारी पक्षाच्या बड्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या पक्षाच्या सज्जतेवर चर्चा करण्यत आली. त्यामुळे भाजपच्या अजेंड्यावर आतापासूनच आगामी निवडणुका आल्याचे सूचित होत आहे.
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्यात पुढील वर्षाच्या प्रारंभी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातील पंजाब वगळता इतर राज्यांत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे संबंधित राज्यांमधील सत्ता राखण्याचे मोठे आव्हान त्या पक्षापुढे आहे.
नुकत्याच विधानसभा निवडणुका झालेल्या पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ या राज्यांत भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली. प्रचंड ताकद लावूनही त्या राज्यांत पक्षाचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच सज्ज होण्याची रणनीती पक्षाने अवलंबल्याचे दिसते.
त्यादृष्टीने अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीचे महत्व वाढले आहे. बैठकीला राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंह तोमर, स्मृती इराणी, पियूष गोयल, धर्मेंद्र प्रधान आदी केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
त्या बैठकीत निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या राज्यांमधील राजकीय आणि प्रशासनाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे प्रचाराच्या मुद्द्यांची चाचपणीही भाजपने सुरू केल्याचे मानले जात आहे.