मुंबई – गेल्या वर्षी भारतातील शेअर बाजाराची निर्देशांक व इतर देशांच्या तुलनेत जास्त वेगात वाढले आहेत. त्यामुळे भारतातील कंपन्यांचे बाजारमूल्य फुगले आहे. अशा परिस्थितीमध्ये वित्तीय अडचणी येऊ शकतात, असे मत स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
भारताचा विकास दर गेल्या वर्षी कोसळला होता. त्याचबरोबर या वर्षीच्या विकास दरावर बराच परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विविध कंपन्यांच्या शेअरची शेअरबाजारावर खरेदी चालूच आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक उच्चांकी पातळीवर गेले आहेत. ही तेजी शाश्वत स्वरूपाची आहे का याबाबत या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
शेअर बाजारामध्ये संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणूक वाढत आहे. जर शेअर बाजार निर्देशांक कोसळले आले तर किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीत सावध राहण्याची गरज असल्याचे या अहवालात सूचित करण्यात आले आहे. 2020-21 या वर्षात भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या 1.42 कोटींनी वाढली आहे. एप्रिल व मे महिन्यात 44 लाख नवे किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजारात आले. किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजारात आगामी काळामध्ये सक्रिय राहतील काय याबाबत अहवालामध्ये शंका व्यक्त करण्यात आली आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणूक वाढण्याची कारणमीमांसा करताना या अहवालात म्हटले आहे की, व्याज दर कमी असल्यामुळे इतर वित्तीय उत्पादनातून नागरिकांना कमी परतावा मिळत आहे. विविध देशाच्या रिझर्व बॅंकांनी भांडवल सुलभता निर्माण केल्यामुळे हे भांडवल शेअर बाजारात येत आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधाच्या काळात नागरिक घरात बसून होते. त्यामुळे या काळात नागरिकांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रयोग केले आहेत.
गेल्या वर्षी एप्रीलच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 28 हजार अंकावर होता. तो आता 52 हजार अंकावर गेला आहे. अर्थव्यवस्था पुरेशा वेगाने वाढत नसताना शेअर बाजारांमध्ये अशीच गुंतवणूक होत राहिली तर निर्देशांक कोसळू शकतात. अशा अवस्थेमध्ये वित्तीय अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. रिझर्व्ह बॅंकेनेही शेअर बाजाराचे निर्देशांक राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात वाढत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय उत्पन्न कमी वेगाने वाढणार असताना शेअर बाजार निर्देशांक मात्र जास्त वेगाने वाढत आहेत.
गुंतवणूकदारांनी जास्त प्रमाण वित्तीय क्षेत्र, माहिती-तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू, वाहन, धातु आणि औषधे क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. जर किरकोळ गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक अशीच कायम राहिली तर मात्र आगामी काळात विविध क्षेत्रातील कंपन्यांना भांडवल उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भारतातील शेअर निर्देशांक 1.8 पटींनी, रशियातील 1.64 पटींनी, ब्राझीलमधील 1.6 पटींनी, चीन मधील 1.59 पटीनी वाढले आहेत