न्युयॉर्क – मुंबईत 1993 साली झालेल्या बॉंम्बस्फोटातील आरोपींना पाकिस्तानात पंचतारांकित पाहुणचार दिला जात असल्याचा आरोप भारताचे संयुक्तराष्ट्रांतील कायम प्रतिनिधी टी. एस. तिरूमुर्ती यांनी यांनी केला आहे. जागतिक दहशतवाद विरोधी कौन्सिलने आयोजित केलेल्या या विषयावरील एका परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. तिरूमुर्ती यांनी दाऊदच्या संबंधात हा आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे.
दाऊद पाकिस्तानात असूनही त्याविषयी सतत इन्कार करणाऱ्या पाकिस्तानने ऑगस्ट 2020 मध्ये तो पाकिस्तानात असल्याचे प्रथमच मान्य केले होते. त्यानंतर पाकिस्तानने 88 जणांवर निर्बंध जारी केले असल्याचे म्हटले होते त्यात दाऊदचाही समावेश होता.
त्या अनुषंगाने त्यांनी हे प्रतिपादन केले असल्याचे सांगण्यात येते. तिरूमुर्ती हे संयुक्तराष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचेही अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की संयुक्तराष्ट्रांच्यावतीने अलकायदाशी संबंधीत विविध संघटना आणि अन्य संघटनांना जेथून अर्थपुरवठा होतो त्यांच्यावर निर्बंध लागू करण्याची सुचना करण्यात आली आहे.
दहशतवादी संघटनांना शस्त्रे मिळू नयेत आणि त्यांच्या प्रवासालाही प्रतिबंध घातला जावा असे संयुक्तराष्ट्रांचे निर्देश आहेत. पण त्याच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान आहे. राजकीय किंवा धार्मिक आधारावर दहशतवादाच्या विरोधीतील कारवाईत पक्षपात होता कामा नये याचीही संपुर्ण जगातून दक्षता घेतली गेली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.