नारायणगाव -करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात तमाशा कला क्षेत्राला अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळे लोककलेतून उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतांची पाय थबकली आहेत. जिल्ह्यातील सुमारे दोनशे यात्रा, उत्सवात तमाशाचे फड असतात. या क्षेत्राला फक्त जिल्ह्यातून 4 ते 5 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
एप्रिल, मे हे महिने सुट्ट्या, यात्रा जत्रांचे आहेत. पुणे जिल्ह्यात नारायणगाव हे तमाशा पंढरी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणाहून यात्रा जत्रांसाठी बुकिंग केले जाते. यामध्ये पूर्ण वेळ तमाशा व हंगामी तमाशा असे दोन प्रकार आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यात 12 तालुके असून सुमारे 2 हजारांपेक्षा जास्त छोटी, मोठी गावे आहेत. यातील काही गावांमध्ये यात्रा काळात तमाशाचे आयोजन केले जाते. हा हंगाम होळीपासून सुरु होऊन बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालतो. चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, कालाष्टमी, अक्षय तृतीया, असे महत्वाच्या दिवशी विविध गावांमध्ये तमाशाचे कार्यक्रम होत असतात.
यावर्षी पूर्ण वेळ तमाशाला सुमारे 70 ते 80 लाखांचा व हंगामी तमाशाला 25 ते 30 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरवर्षी पुणे जिल्ह्यात या दोन महिन्याच्या कालावधीत 900 ते 1 हजार यात्रा होतात. पण करोनामुळे त्यावर पाणी फिरले आहे. याचा फटका अनेक कलावंत आणि फड मालकांना बसला आहे.
4 ते 5 वर्षांपासून बैलगाडा शर्यती बंद असल्याने त्याचा फटका यात्रावर बसला होता. आता यामध्ये करोनाची भर पडली आहे. यात्रोत्सवामध्ये हार, फूल, नारळवाले, खेळणी, छोटे हॉटेलवाले असे अनेकजण अवलंबून असतात. पूर्णवेळ तमाशा फडात रोजचा 70 ते 80 हजार व हंगामी तमाशा फडात 25 ते 30 हजार रुपये खर्च असतो. यंदा अनेक तमाशा कलावंत बेरोजगार झाले आहेत. फड मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अगोदरच सावकार,पतसंस्थांचे कर्ज डोक्यावर असून यंदाच्यावर्षी हंगाम न झाल्याने तमाशा क्षेत्र पूर्णपणे अडचणीत सापडले आहे.
सरकारकडे अनुदानासाठी मागणी करणार
आखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर व किरण ढवळपुरीकर म्हणाले की, गेली 4 ते 5 वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थितीमुळे तमाशा क्षेत्र अडचणीत आहे. तमाशा मालक हे लोककला जिवंत राहण्यासाठी जीवाचे रान करून अडचणींवर मात करीत आहेत. करोनामुळे यात्रा रद्द झाल्याने अजूनच आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. सरकारने यापुढे लोककला जिवंत ठेवण्यासाठी पूर्णवेळ तमाशा फडाला 25 लाख व हंगामी तमाशा फडाना 10 लाखांचे विशेष अनुदान देण्याची मागणी सरकारकडे करणार आहे.