पिंपरी -महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यातील नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस हे पहिले सरकार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य तपासण्या व उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित दोन दिवसीय अटल महाआरोग्य शिबीराचे शनिवारी (दि. 24) राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी नारायणपूरचे नारायण महाराज, माजी महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप, शिबिराचे आयोजक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, यांच्यासह नामांकित हॉस्पिटलचे डॉक्टर, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिबीरात सहभागी उपस्थित होते.
डॉ. तानाजी सावंत म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारने माता सुरक्षित, तर घर सुरक्षित या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील साडेतीन कोटी महिलांच्या आरोग्याचा पूर्ण डेटा तयार केला आहे. आता त्या महिलांना सर्व उपचार मोफत देण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नर्सरीतील बालकांपासून ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांच्याही आरोग्याचा डाटा तयार केला जाणार आहे. हे झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करून त्यांचाही डाटा सरकार तयार करेल. प्रत्येकाला मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देणार आहे.
करोनाचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःहून काही बंधने पाळावीत. महाराष्ट्रातील 95 टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत. 60 ते 70 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतले आहे. लसीकरणामुळे इतर राज्य आणि देशांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. रुग्णसेवा करण्याचे पंतप्रधानांचे व्रत आपणाला पुढे न्यायचे आहे.