नवी दिल्ली – निसर्गप्रेमाच्या (NisargPrem) गप्पा मारणारे खूप जण असतात, मात्र फारच थोडे लोक आपल्या कृतीतून निसर्गप्रेम दाखवून देतात. सध्या देशभर दिवाळीची धूम आहे आणि यामध्ये सर्वाधिक वाजवले जातात ते फटाके. मात्र,अनेक फटाक्यांमुळे प्राणी-पक्षी यांना किती त्रास होतो याचा कुणीच विचार करत नाही. तामिळनाडूमधील इरोड (Tamilnadu Irod) जिल्ह्यातील सात गावच्या गावकऱ्यांनी पक्ष्यांना त्रास होता कामा नये, या भावनेतून फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. (Ban Firecrackers)
इरोड शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर वडामुगम वेलोडेजवळ एक पक्षी अभयारण्य आहे. येथे थंडीच्या दिवसांत प्रजोत्पादनासाठी हजारो स्थलांतरीत पक्षी येत असतात. त्यांना शांतता मिळावी म्हणून सेलप्पामपलयम, वडामुगम वेल्लोडे, सेम्मंदमपालयम, करुक्कनकट्टू वलसू, पुंगमपाडी आणि इतर दोन गावांमध्ये ‘मूक दिवाळी’ची परंपरा कायम ठेवली गेली.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, येथे मोठ्या प्रमाणात पक्षी राहतात, त्यांना फटाक्यांच्या आवाजाने आणि ठिणग्यांमुळे इजा होऊ नये. यासाठी आम्ही फटाक्यांपासून सर्वांना दूर ठेवले होते.
अनेक भागातील स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी प्रजाती ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान अंडी घालतात. साधारणपणे दिवाळीचा सणही याच महिन्यांत येतो. त्यामुळे गावकऱ्यांनी साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. फटाके न वाजवता, दणदणाट न करता केवळ दिवे लावून दिवाळी साजरी केली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 22 वर्षांपासून हा संवर्धनाचा दृष्टिकोन अवलंबला जात आहे.
दिवाळीच्या (Diwali) वेळी ते स्वत:साठी नवीन कपडे खरेदी करतात आणि फक्त चमचमीत दिवे लावतात, असे गावकऱ्यांनी सांगितले. पण ध्वनी प्रदुषण करणारे फटाके वापरण्यास येथे सक्त मनाई आहेत.