नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भविष्यातील प्राधान्यांसह पुढील आर्थिक विकासाच्या अपेक्षा मांडल्या आहेत. तसेच त्यांनी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्त्वपूर्ण घोषणांची माहितीदेखील यावेळी दिली. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे म्हटले होते.
आता राहुल गांधींच्या प्रतिक्रियांवर अर्थमंत्र्यांनी आपले मत मांडले आहे. राहुल गांधींची खिल्ली उडवत अर्थमंत्र्यांनी ट्विटरवर भाष्य करून काहीही होत नाही, त्यांनी आधी काहीतरी केले पाहिजे, असे म्हटले आहे. मला त्या लोकांची दया येते जे खूप लवकर प्रतिक्रिया देतात. तुम्हाला ट्विटरवर काहीतरी टिका करायची आहे म्हणून ते बोलतात. हे तुमच्या कामी येणार नाही. त्यांनी आधी कॉंग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
पगारदार, मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोटे व्यापारी यांच्यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पात काहीही नसल्याचे राहुल गांधींनी याआधी म्हटले होते. राहुल गांधी यांनी ट्विट करून, मोदी सरकारच्या बजेटमध्ये काहीही नाही. मध्यमवर्गीय, पगारदार वर्ग, गरीब आणि वंचित वर्ग, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीही नाही, असे म्हटले होते.
पत्रकार परिषदेत जेव्हा अर्थमंत्र्यांना राहुल गांधींच्या टिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गृहपाठ न करता अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. त्यांनी प्रथम त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांची काळजी घ्यावी. केंद्राने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या त्यांनी राबवाव्यात. त्यांनी पंजाब, महाराष्ट्र आणि छत्तीसगडकडे लक्ष द्यावे,असे अर्थमंत्री म्हणाल्या.