चिंबळी, (वार्ताहर) – गेल्या वर्षी पावसाने फिरवलेली पाठ, सतत बदलणारे वातावरण आणि आधूमधून येणारा अवकाळी पाऊस असे चक्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याने खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील बळीराजा काकुळतीला आला आहे.
गेल्यावर्षी पावसाने अत्यल्प हजेरी लावल्याने खरिपाचे पीक परिपूर्णपणे हाती आले नाही.
तर रब्बीत सतत बदलणार्या वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजाला सततत पिकांवर फवारणी करावी लागल्याने उत्पन्नापेक्षा इतर खर्चच अधिक झाल्याने बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून गेले आहे.
लहरी वातावरणाला तोंड देतादेता बळीराजा पुन्हा उभारी घेतो आणि कशीबशी पिकं उभी करतो आणि अस्मानी संकटाने पुन्हा ते भूईसपाट करायचे, असा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. थंडी आणि उन्हाचा वेगळाच खेळ निसर्ग खेळत असताना अचानक आलेल्या अवकाळीमुळे जीवापाड वाढवलेली शेतातली उभी पिके आडवी होतात,
असे ऋतूचक्रच बदलत्या हवामानाने तयार झाले असल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. निसर्गाचा हा थयथयाट पाहण्याशिवाय काही पयार्यही नसल्याने रात्रंदिवस राबणारा शेतकरी उद्ध्वस्त झालाय.
बाजरी, भुईमुगावर रोगराईचा घाला
मरकळ, धानोरे, सोळू, केळगाव, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे परिसरातील बळीराजाने उन्हाळी हंगामातील बाजरी भुईमुग व इतर पिके घेतली आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगळ वातावरणाबरोबच अवकाळी पाऊस बरसण्याची शक्याता आहे. या वातावरणाचा फटका निसवणीस आलेल्या बाजरीस खुराणीस आलेल्या भुईमूग पिकावर रोगराई परिणाम होऊन पिके सुकू लागली आहे. तसेच अंतिम टप्प्यात काढणी सुरू असलेल्या कांदा व ज्वारी पिकाची नुकसान होऊ नये म्हणून बळीराजाची धांदल उडाली आहे.