मुंबई : चातकाप्रमाणे वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने आज राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत देखील पावसाने हजेरी लावली लावल्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई-पुण्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची वाट नागरिक पाहत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. खरीप पूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली असून, पेरणीसाठी शेतकरी सज्ज आहेत. दरम्यान, आज पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यातील विदर्भातही दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी सुखावला आहे.तर तिकडे चिपळूणमध्ये मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्याने शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली या भागात हलक्या पावसाला सुरवात झाली आहे. पुढच्या आठवड्यात आषाढी वारीचा सोहळा आहे. त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.