नियती शिंदे यांच्या इशाऱ्याने नगरपालिका झाली जागी
आळंदी – “केळगाव-आळंदी हद्दीचा वाद; नागरिकांचे आरोग्य बिघडले’ या मतथळ्याखाली दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रकाशित करताच आळंदी नगरपालिका खडबडून जागी झाली आणि त्यांनी हा साचलेला कचरा त्वरीत उचलून परिसर चकाचक केल्याने नागरिकांनी “प्रभात’चे आणि आंदोलनाचा इशारा देणाऱ्या नियती शिंदे यांचे आभार
मानले आहेत.
केळगाव-आळंदी रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा आळंदी नगरपालिकेने की केळगाव ग्रामपंचायतीने उचलायच्या या भांडणात हा कचरा रस्त्यावरच पडून असल्याने स्थानिकांना दुर्गंधीसह रोगराईला सामोरे जावे लागत आहे. तसेच आरोग्य विभागाच्या ठेकेदाराला पाठीशी घालू नये, तरी येत्या सात ते आठ दिवसांत या दोघांनीही सामोपचाराने हा प्रश्न सोडवला नाही, तर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा ताई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नियती शिंदे यांनी निवेदनाद्वरे दिला होता.
या इशाऱ्याचे वृत्त “प्रभात’ने प्रसिद्ध करताच नगर पालिका प्रशासन खडबडून जागी झाली आणि संबंधित ठिकाणचा संपूर्ण कचरा जेसीबीने उचलून त्याठिकाणी डी. टी. पावडर मारण्यात आली. त्याचबरोबर पद्मावती रस्ता येथील भगवानगड, पद्मावती झोपडपट्टी लगत असणारा कचऱ्याचा ढीग देखील उचलण्यात आला तसेच इतर ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीगही नगरपालिकेने उचलून त्याची विल्हेवाट लावली.