नगर – नगरच्या बायपासच्या दुरुस्तीचे काम एक महिन्यात पूर्ण झाले नाही, तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करा , असे स्पष्ट आदेश मी दिले आहेत. अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. नगर -मनमाड महामार्ग हा सहापदरी करण्यापेक्षा आहे तोच कशा पद्धतीने चांगला करता येईल , याकडे लक्ष द्यावे , त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगर येथे कृषी, नॅशनल हायवे आदींची बैठक पार पडल्यानंतर ते बोलत होते . यावेळी खासदार विखे म्हणाले की, पंतप्रधान कृषी योजना मध्ये नगर जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला आहे . दोन टप्प्यांमध्ये मध्ये त्यांना रक्कम देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मध्ये नगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे असेही ते म्हणाले. नॅशनल हायवे बैठक पार पडली. यामध्ये नगर बायपास संदर्भात ज्या ठेकेदाराची मुदत 2018साली संपली ,त्याला मुदतवाढ कशी दिली, हा खरा प्रश्न आहे . आता त्याच्याकडूनच काम करून घ्या, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. त्यांनी जर जानेवारीअखेरपर्यंत काम पूर्ण केले नाही, तर संबंधितांवर कारवाई करा , असे स्पष्ट आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर-कोपरगाव हा महामार्ग सहापदरी करण्यासाठी विषय घेतला आहे. नगर करमाळा महामार्गासाठी काही ठिकाणी जमीन संपादन करण्याचा विषय आहे. मिरजगाव येथील सुद्धा विषय अशा पद्धतीने मार्गी लावायचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात सुद्धा दोन जणांचे जमिनीचे हस्तांतरण हे होणे बाकी आहे .यामध्ये पेट्रोल पंपाची जागा आपल्याला घ्यायची असल्यामुळे संबंधित कंपनीने त्याची तयारी दर्शवली आहे व अन्य दोन खाजगी जागा सुद्धा लवकरच हस्तांतरित केल्या नंतर साधारणतः फेब्रुवारी मध्ये उड्डाणपुलाचे काम कशा पद्धतीने सुरू होऊन जाते आम्ही नियोजन करणार असल्याचे सांगितले.
केंद्र शासनाच्या माध्यमातून जी कामे आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे . त्यासंदर्भात सुद्धा आता मी सर्व नगरपालिका यांचा एकत्रित बैठक घेणार आहे. महानगरपालिके संदर्भामध्ये दिनांक आठ जानेवारी रोजी सुद्धा बैठक होणार आहे. त्या दिवशी सर्व विषयांचा आढावा घेऊन कोणत्याही प्रकारे कामे प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
कालवा सल्लागार समितीच्या बैठका परस्पर होतातच कशाःविखे
कालवा सल्लागार समितीच्या बैठका परस्पर होतात, ही बाब अतिशय गंभीर आहे. पाणी द्या, पाणी द्या, म्हणत असताना किती बैठका घ्यायच्या आहेत , त्यातून काही फलित होणार नसेल तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे कुकडी आवर्तनाचे नियोजन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. तुमच्या अडचणी मला मान्य आहेत. मात्र जनतेचे हाल यातून होता कामा नये, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.
आगामी काळामध्ये शेतकऱ्यांच्या समवेत बैठक घेण्यासाठी त्या त्या तालुक्यात नियोजन करावे, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी विखे बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, कार्यकारी अभियंता आर. के. जगताप, नामदेव राऊत, अशोक खेडकर यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.