पिंपरी, (प्रतिनिधी ) – गेल्या कित्येक दिवसांपासून भिजत घोंगडे राहिलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचा तिढा अखेर सुटला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवारपासून (दि. १६) सुरू होत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पालकांना ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
राज्य सरकारने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेत बदल केला आहे. या नव्या बदलानुसार आता सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खासगी शाळा असेल, तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, आता राज्यात ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या सुरवातीला जाहीर केल्या होत्या. त्यात प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळा प्रवेशाचा प्राधान्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात, संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील, आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणी आणि शाळांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता पालकांना मंगळवारपासून (दि. १६) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी पालकानी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.