तीव्र जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा
पिंपरी – शहरातील शास्तीकर कायमचा रद्द व्हावा आणि शास्तीकरात सरसकट माफी मिळावी, यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेने दंड थोपटले आहेत. शास्तीकर माफीबाबत सरकार दरबारी पाठपुरावा तसेच प्रसंगी जनआंदोलन उभारण्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. 14) आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये माजी आमदार विलास लांडे यांनी शास्तीकर माफी आणि कर रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
भोसरी, लाडेवाडी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेचे उपाध्यक्ष व शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, कार्याध्यक्ष यश साने, सचिव व माजी नगरसेवक विनायक रणसुभे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उदय पाटील, तात्या सपकाळ, विलास नढे, राजेंद्र छेडे, उत्तम आल्हाट, आतिश बारणे, सुधाकर भोसले, अमर फुगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
लांडे म्हणाले की, पोट भरण्यासाठीच संघर्ष करण्याची वेळ आलेल्या नागरिकांनी लाखों रुपयांचा शास्तीकर कसा भरायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या नागरिकांच्या मनात शास्तीकराबाबत प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. शास्तीकराचे भूत कायमचे नष्ट व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेने एका संघटनेच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला सर्व पिंपरी-चिंचडकरांनी साथ द्यावी. शास्तीकर कायमस्वरुपी रद्द होत नाही आणि कर माफ केले जात नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या आढावा बैठकीत राजेंद्र छेडा, रेखा दुधभाते, दशरथ जमदाडे, अमोल पानसरे, डॉ. अजित कदम यांनी आपले मत व्यक्त केले.
अँड. स्वप्निल पवार यांनी शास्तीकराविरोधात कायदेशीर लढा कसा द्यायचा याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून लवकरच निवेदन द्यायचे ठरले. विनायक रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. तर धनंजय भालेकर यांनी आभार मानले.
एक दशकापासून मानगुटीवर बसलेला झिजिया कर
माजी आमदार विलास लांडे म्हणाले, शास्तीकर हा गेल्या एक दशकापासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर बसलेला झिजिया कर आहे. शास्ती माफीची शहरातील नागरिक कित्येक वर्षांपासून मागणी करत आहेत. परंतु, नागरिकांच्या मागणीला दाद दिली जात नाही. शास्तीकराच्या थकित बिलावर नागरिकांना दंड आकारला जात आहे. त्यामुळे शास्तीकराचा थकित आकडा फुगला आहे. हा आकडा पाहून शास्तीकर वसुलीच्या नोटीस आलेल्या नागरिकांच्या पोटात गोळा आलेला आहे.