पिंपरी – इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाची वयाची सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष ठरविण्यात आला आहे. मात्र, यामध्ये शिथिलता आणण्याच्या मागणीची अनेक निवेदने प्राप्त झाल्याने, बालकाच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता आणण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर सचिव संतोष गायकवाड यांनी दिले आहेत.
याप्रकरणी निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने बालकांचा शिक्षण अधिकाराअंतर्गत केंद्रीय पद्धतीने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश दिला जातो. त्याकरिता 30 सप्टेंबर ही दिनांक मानली गेली आहे. त्यानुसार प्ले-ग्रुप व नर्सरीसाठी बालकाचे वय किमान 3 वर्षे असणे आवश्यक आहे, तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशाकरिता सहा वर्षे वय पूर्ण असल्याची बाब निश्चित करण्यात आली आहे.
बालकाच्या वयामध्ये काही दिवसांचा फरक असल्यामुळे सबंधिताचे संपूर्ण वर्ष वाया जात होते. त्यामुळे वयामध्ये काही दिवसांची शिथिलता आणावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये 15 दिवसांची शिथिलता आणण्यास मान्यता देण्यात आली आहे. वयाबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.