– सुनील राऊत
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून चौकातील वाहतूक कोंडीने दिवसा चांदण्या पाहण्याची वेळ पुणेकरांवर ओढावली आहे. याबाबत वारंवार तक्रारी झाल्या. “प्रभात’सह अन्य माध्यमांनी हा विषय प्रखरपणे मांडत जनतेच्या व्यथा पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “विकास हवा तर कोंडी सहन करा’ असे सांगत ही कोंडी फोडण्याची जबाबदारी असलेले सर्वच शासकीय विभाग आतापर्यंत केवळ बैठका आणि तात्पुरती मलमपट्टी करत सोयीस्कर दुर्लक्ष करत होते. मात्र, शनिवारी “सिरियसली’ नियोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री या वाहतूक कोंडीत तब्बल दीड ते दोन तास खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकून पडल्याने सर्वच यंत्रणेची तारांबळ उडाली आणि हा कोंडीचा विषय किती गंभीर आहे, याची जाणीव या अधिकाऱ्यांना झाल्याचे चित्र शनिवारी सरकारी सुट्टी असतानाही शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या धावपळीतून दिसून आले. थेट मुख्यमंत्रीच कोंडीत अडकल्याने सर्वसामान्यांना काय त्रास सहन करावा लागत असेल, याची जाण या निमित्ताने का होईना या यंत्रणांना झाली. त्यामुळे किमान यातून आता तरी पुणेकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार म्हणून चांदणी चौक ओळखला जातो. पुणे-बंगळुरू महामार्गावरच हा चौक असल्याने तेथे नेहमीच वाहतूक कोंडी होती. त्यामुळे महापालिकेने येथे बहुमजली उड्डाणपूल बांधण्याची तयारी केली आहे. मात्र, हे काम महापालिकेच्या क्षमतेचे नाही असा आव आणत हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आले. त्याचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात येऊन केले.
मात्र, त्यानंतर तब्बल वर्षभर या पूलाचे कामच सुरू झाले नव्हते. त्यामुळे अनेकदा गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर रडतखडत ऑगस्ट 2018 मध्ये कामास सुरूवात झाली. हे काम मोठे असल्याने त्या ठिकाणी काम पुढे जाईल तसेच वाहतूक कोंडी होणार हे निश्चित होते. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी आधीच उपाय योजना आवश्यक होत्या. मात्र महापालिका, महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन यांनी सोयीस्कर भूमिका घेत प्रत्येक वेळी कोंडीची समस्या गंभीर होण्याची वाट पाहिली. त्याची परिणीती म्हणून गेल्या तीन ते चार वर्षांपासून या चौकात प्रचंड कोंडी होत असून सकाळी आणि संध्याकाळी तासन्तास नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.
ही कोंडी फक्त याच महामार्गावरील वाहनांपुरती मर्यादित न राहता, मुळशी, बावधन, कोथरूड, एनडीएकडे जाणारे रस्त्यांवरही पसरली. त्यामुळे सर्वच मार्गांवर वाहनांच्या रांगा लागता आहेत. हे केवळ नियोजनाच्या अभावामुळे होत असल्याचे वास्तव आहे. महामार्गावर काम सुरू असल्याने या ठिकाणी रस्त्यावर थांबणाऱ्या वाहनांना बंदी घालणे, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव घालणे, जड वाहने आणि हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ते आणि इतर मार्ग खुले करून देणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे अशा वेगवेगळ्या नियोजनाची आवश्यकता असताना अधिकारी केवळ कार्यालयातील “एसी’मध्ये बसून पुणेकरांचे होणारे हाल सीसीटीव्हीत पाहत आले आहेत. मात्र, आता या कोंडीचा फटका थेट मुख्यमंत्र्यांनाच बसल्याने त्यांनी रात्रीच यंत्रणेला फैलावर घेतले. त्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत कोंडी फोडण्यासाठी उपाय योजना करण्यास सुरूवात केली.
मात्र, हे होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडीच तास कोंडीत अडकून पडावा लागला. त्यामुळे कधी ना कधी होणाऱ्या या घटनेची वाट पाहण्याऐवजी, सर्व यंत्रणांनी दररोज या कोंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या असत्या तरीही ही समस्या किती गंभीर आहे, याची जाणीव सर्व यंत्रणांना झाली असती. मात्र, उशिरा का होईना पण जागे झालेले प्रशासन काहीतरी उपाय योजना करून पुणेकरांना या कोंडीतून सोडवेल ही माफक अपेक्षा आहे.