पुणे – जिल्ह्याच्या भात उत्पादन पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हाती आलेले भातपीक पाण्यात गेले. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला असून, यंदा भात उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मावळ, खेड, भोर, वेल्हा, मुळशी, आंबेगाव, जुन्नर या भागात मोठ्या प्रमाणावर भातपीक घेतले जाते. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी भाताची लागवडदेखील उशिराने केली. पश्चिम पट्ट्यात 72 हजार 953 हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली होती. मात्र, पावसामुळे त्यापैकी 57 हजार 817 हेक्टरवर म्हणजेच 79 टक्के क्षेत्रावर भाताची पुनर्लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या इंद्रायणी वाणाचा समावेश आहे. खरिप हंगाम हातचा जाऊ नये, याकरिता शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेले पीक अवकाळी पावसाने मातीमोल केले.
शेतातील काढणीस आलेली उभी पिके आडवी झाली. तर या तडाख्यातुन वाचलेले पिक करपा रोगाला बळी पडले. या सर्व बाबींमुळे भात पिकाचे सरासरी उत्पादन घटले आहे. हॉटेलमध्ये थाळीची लज्जत वाढविणाऱ्या इंद्रायणी वाणाला असलेली मागणी लक्षात घेऊन, याच कालावधीत इंद्रायणी तांदळाची 70 रुपये प्रतिकिलोने विक्री करण्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे शहरातील हॉटल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.