नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात पूर्णपणे पोखरून काढले आहे. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने विक्रमी करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसात देशात साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांचा करोना, ऑक्सिजनअभावी बेड न मिळाल्याने मृत्यू होत आहे. भारतातील एकूण करोना मृतांची संख्या सव्वादोन लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी काहीसा दिलासा देणारी आहे. मात्र मृत्यूंच्या बाबतीत चिंता कायम आहे. देशातील करोना रुग्णवाढ मंदावली असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाख ५७ हजार २२९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख २० हजार २८९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे नवीन रुग्ण आणि घरी परतलेले रुग्ण ही संख्या दिलासा देणारी आहे. मात्र, देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट झाली नसल्याचे दिसत आहे.
India reports 3,57,229 new COVID19 cases, 3,20,289 discharges and 3,449 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,02,82,833
Total recoveries: 1,66,13,292
Death toll: 2,22,408
Active cases: 34,47,133Total vaccination: 15,89,32,921 pic.twitter.com/Zr1mimN4vH
— ANI (@ANI) May 4, 2021
देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींचा संख्या दोन लाख २२ हजार ४०८ इतकी झाली आहे. तर देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ रुग्ण उपचाराधीन आहेत. करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिका (५,९१,०६२) पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्राझील (४,०७,७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
३ मे रोजीच्या आकडेवारीनुसार २४ तासांत देशात करोनामुळे ३,४१७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांची एकूण संख्या दोन लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली होती. त्यात आता आणखी तीन हजार ४४९ रुग्णांची भर पडली आहे. करोनातून आतापर्यंत एक कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ जण बरे झाले असून, मृत्युदर १.१० टक्के इतका आहे. देशातील एकूण मृत्यूपैकी ७० हजार २८४ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.