मुंबई : देशात करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर थैमान दुसऱ्या लाटेने घातल्याचे दिसत आहे. देशात आणि राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर सर्वसामान्यांची मोठी परवड होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. याच विदारक परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत देश आणि राज्यातीळ गोंधळावर टीकास्त्र डागले आहे. “लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहेत, पण औषध नाही. व्यापारी आहेत, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातलं नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळंच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही,” असे म्हणत संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 4, 2021
राज्यासह देशातील स्थिती बिकट आहे. राज्यात दररोज ५० ते ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण झालेलं आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असून, राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, महाराष्ट्रात वाढलेल्या मृतांच्या संख्येमुळे चिंता कायम आहे. दुसरीकडे देशातील परिस्थितीही हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. राजधानी दिल्लीत दररोज ऑक्सिजन अभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. उत्तर प्रदेशातही परिस्थिती चिंताजनक असून, देशात दररोज साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे.