महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने महाराष्ट्रातील “महाविकास आघाडी’ या बहुचर्चित प्रयोगाचे पुढे काय होणार, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याच पुढाकाराने विरोधी पक्षांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. साहजिकच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने यशवंत सिन्हा यांना आपला पाठिंबा द्यावा असे अपेक्षित होते; पण उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करून आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अर्थात, यापूर्वीही शिवसेनेने पक्ष न बघता उमेदवार बघूनच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपली भूमिका घेतली आहे.
प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या तेव्हाही शिवसेनेने भाजपचा उमेदवार कोण आहे याचा विचार न करता महाराष्ट्र कन्या म्हणून त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. अर्थात, या वेळची गोष्ट निश्चितच वेगळी आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल, अशी आशा व्यक्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने अशी भूमिका घेताना आम्हाला अजिबात विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी औरंगाबादच्या नामांतराचा विषय समोर आला असता त्या नामांतराच्या विषयाबाबत आम्हाला माहिती नव्हती, अशी माहिती दिली होती.
उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापासून थोडे अंतर राखण्याचा निर्णय घेतला असावा. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे फक्त पक्षसंघटना बळकट करण्यावर आणि पक्षसंघटना टिकवून ठेवण्यावरच लक्ष केंद्रित करत आहेत. विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शिवसैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कालावधीत शिवसेनेकडून कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीबाबत कोणतीही राजकीय पुढाकाराची किंवा राजकीय चर्चेची गोष्ट घडलेली नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेण्याची एखाद-दुसरी घटना सोडता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांपासून थोडे अंतर राखण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असावा, असे संकेत मिळत आहेत. अर्थातच त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाचे पुढे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
खरे तर अडीच वर्षांपूर्वी जेव्हा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र आले होते तेव्हा अशाच प्रकारचा प्रयोग इतरत्रसुद्धा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपला जर पर्याय निर्माण करायचा असेल, तर स्थानिक स्तरावर असे प्रयोग होऊ शकतात हे महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगाने दाखवून दिले होते. पण शिवसेनेतील अंतर्गत विरोधामुळे जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता गेली तेव्हा विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठीही आघाडी तयार नाही की काय, अशी शंका आता दिसत आहे. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची आघाडी तयार होऊ शकते आणि सत्ता गेल्यावर एकत्रितपणे विरोधी पक्ष म्हणून अशा आघाड्या यशस्वी होऊ शकत नाहीत, असा निष्कर्ष जर या प्रकरणात काढण्यात आला तर चुकीचे ठरणार नाही. आगामी कालावधीत अनेक नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका आहेत. 5 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी बाजी मारली होती. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या अनेक महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली होती.
आगामी निवडणूक जर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित लढवून भाजपाला आव्हान उभे केले असते, तर राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसला असता. पण सध्या तरी तसे कोणतेही चित्र दिसत नाही. अनेक ठिकाणी कॉंग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची राजकीय आघाडी कार्यरत होती. एकत्रच विरोधी पक्ष म्हणूनही ते काम करत होते. आता कॉंग्रेसने अनेक ठिकाणी स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कोठेही दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे. राज्यात विविध ठिकाणी प्रादेशिक स्तरावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप यांचे आपापले असे गड आहेत. अशा ठिकाणी त्यांना स्थानिक पातळीवर सत्तेत भागीदारी नको आहे. साहजिकच महाविकास आघाडी एकत्रपणे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे.
सध्यातरी शिवसेनेला आपली पक्षसंघटना वाचवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहेत आणि दुसरीकडे लवकरच येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता टिकवण्यासाठी कामही करावे लागणार आहे. साहजिकच महाविकास आघाडीतील कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत आगामी कालावधीत कोणतीही नवीन व्यूहरचना करण्यास शिवसेना फारशी उत्सुक नाही, हे उघड आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यासाठी शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा जन्म झाला होता, पण उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद जाताच ही महाविकास आघाडीसुद्धा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिवसेनेतील पक्षांतर्गत लोकांनी आपल्याला दगा दिला असला, तरी आणीबाणीच्या परिस्थितीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याला साथ दिली अशी जाहीर माहिती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा निरोप घेतानाच्या भाषणात दिली होती. ही परिस्थिती असतानाही एक विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात ठेवण्याची कोणतीही मानसिकता उद्धव ठाकरे यांच्याकडे नसल्यानेच महाविकास आघाडीचा हा प्रयोग सध्यातरी दोलायमान स्थितीत दिसत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना आपले अस्तित्व महत्त्वाचे वाटत असल्यानेच ही आघाडी आता अस्तित्वहीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.