पाटण/कोयनानगर – सत्तेत असलेले सर्वच राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले असून जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्यांची त्यांना आठवणही राहिलेली नाही. अशा परिस्थितीत बेमुदत उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान त्यांना असणार नाही. त्यामुळे पुनर्वसनाच्या लढ्याची तारीख पुढे ढकलून येत्या 27 जुलैपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.
पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संतोष गोटल, सचिन कदम, सिताराम पवार, प्रवीण साळुंखे, परशुराम शिर्के, शिवाजी कांबळे, किसन सुतार, अनिल देवरुखकर यांची उपमुख उपस्थिती होती. डॉ. पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात कुठलाही लढा चालू असला, तरी सत्तेत असलेले व त्यांच्याकडे नवीन गेलेल्यांमध्ये मंत्रीपदांसाठी प्रचंड चढाओढ सुरु आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण एवढ्या निंदणीय थराला कधीच गेले नव्हते. गेल्या चार दिवसांत राजकारणी इकडून तिकडे पक्ष बदलत असून जनतेशी त्यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसते. यामध्ये जनता पुर्णपणे बाजूला आहे. या साठमारीत राजकारण्यांना जनतेचे भान नसून त्यांना सत्तेशिवाय काही दिसत नाही. त्यांना जनतेची व त्यांच्या प्रश्नांची सुद नाही.
या परिस्थितीमुळे आज बुधवार, दि. 19 जुलैपासून सुरु होणारे धरणग्रस्तांचे उपोषण 10 दिवस पुढे ढकलून ते येत्या 27 जूलैपासून कोयना जलाशयाच्या काठावर कोणत्याही परिस्थितीत सुरू करून त्यास व्यापक स्वरूप देणार आहोत. या उपोषणास कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली प्रकल्पातील सुमारे 2 हजार धरणग्रस्त सहभागी होणार असल्याचेही डॉ. पाटणकर यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत दरे (महाबळेश्वर) येथे झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. घेतलेल्या निर्णयांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही झाली नाही. दरम्यान, प्रधान सचिव व उच्चाधिकार समितीच्या बैठकाही झाल्या. परंतु, त्यातही घेतलेल्या निर्णयावर पुढे आदेश होऊन सह्या झाल्या नाहीत. अशी परिस्थिती पूर्वी कधी घडली नव्हती. मग सरकार कोणाचेही असू दे! प्रशासनाला बाजूला ठेवून अंतिम निर्णय झाले नाहीत. तसेच झालेल्या आदेशांवर मुख्यमंत्र्याची सहीही न झाल्याने सर्व जिल्हाधिकारी गप्प आहेत.
दरम्यान, कोयना धरण उच्चस्तरीय समितीच्या बैठकीआधी सांगली व सातारा जिल्ह्यात जमिनी पसंती झाल्या आहेत. अशा सुमारे 800 च्या आसपास खातेदारांनी अर्ज केले आहेत. त्याचे पुढे काय करणार? असा सवाल उपस्थित करत येत्या 27 जुलैपासून कोयना शिवसागर जलाशयालगत आपण धरणग्रस्तांसह उपोषणास बसणार असल्याचेही डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले. यावेळी विठ्ठल पवार, तानाजी बेबले, आनंदा सपकाळ, गुलाब काटे, रमेश शिंदे, बाजीराव पन्हाळकर, दादू थोरवडे, विनायक शेलार, गंगाराम झोरे, कमल कदम, लक्ष्मण शेलार, जयवंत लाड, साधू सपकाळ, बळीराम लांबोर, संतोष कदम, आनंदा साळुंखे, अशोक माने, सुरेश थोरवडे यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.