सणबूर – पाटण तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. शिवाजीराव देसाई यांनी आपले आयुष्य वेचले. मात्र तालुक्यातील काही लोकांनी कारस्थान करून कोयना शिक्षण संस्थेतून देसाई परिवाराला जाणीवपूर्वक बाजूला केले. मात्र, तरीही तालुक्यात विविध प्रकारची शिक्षणाची दालने उभी करून देसाई परिवाराने सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा प्रयत्न केला. आता तालुक्यात लवकरच अग्रीकल्चर महाविद्यालय उभारणार असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
दौलतनगर (मरळी) ता. पाटण येथे स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या 37 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, डॉ. दिलीपराव चव्हाण, पाटण बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, विलास गोडाबे, अशोकराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. देसाई म्हणाले, सहकार व शिक्षण क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत काम कसे करायचे, याची शिकवण खर्या अर्थाने स्व. आबासाहेबांनी दिली. कारखान्याची उभारणी करताना लोकनेते सत्तेमधून बाहेर गेले, तरीही खडतर परिस्थितीत त्यांनी कारखाना चालवला. अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा केला. स्पर्धेचे युग आहे. आपण स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे.
ग्रामीण भागात मुलं-मुली अव्वल कामगिरी करत असून त्यांनी आपल्या पालकांचे नाव उज्वल करण्याची जिद्द मनी बाळगली पाहिजे. तालुक्यातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका काढली आहे. शहरातील मुलं स्पर्धा परिक्षेत यश मिळवत आहेत. आपल्याही तालुक्यातील मुलं अशी घडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ते पुढे म्हणाले, आपल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अग्रिकलक्चर सारखे महाविद्यालय निर्माण व्हावे, अशी ग्रामीण भागातून मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच आपण पाटण मतदारसंघात अग्रिकलक्चर महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच पाटण मतदारसंघ हा विकासकामांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक रोल मॉडेल होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. स्व आबासाहेबांची कर्मभूमी, जन्मभूमीत आपण आहोत. त्यांचे विचार आत्मसात करून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव उज्वल करण्याचे काम आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, ना. देसाई यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक केंद्रात प्रथम, व्दितीय, तृतीय व विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पांडुरंग नलावडे, बबनराव शिंदे यांनी आभार मानले.
कोयना शिक्षण संस्थेत कारस्थान केले..
लोकनेते बाळासाहेब देसाई, के. व्ही. बापू पाटील, भागवतराव देसाई यांनी कोयना शिक्षण संस्था उभारली. काही लोकांनी त्यांना या संस्थेतून बाहेर काढत संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली. राजकारण, कटकारस्थान करुन त्यांनी कोयना शिक्षण संस्था ताब्यात घेतली. त्यामुळेच आम्ही जिद्दीने मोरणा संस्था स्थापन करून तालुक्यात शिक्षणाची दारे खुली केली, असा टोलाही मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.