केवळ देशातच नाही तर जगभरातील फॅशन विश्वात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, असे भारतीय फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे. राजस्थानातील दुर्गम भागातील मुलींसाठी खास गणवेश तयार करून सब्यासाची यांनी समाजाचे ऋण फेडण्याचा एक लहान प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
सब्यसाची मुखर्जी म्हटल्यावर भरजरी साड्या, पारंपरिक लेहंगा, नाविन्यपूर्ण डिझाइनचे दागिने डोळ्यासमोर येतात. त्यांनी तयार केलेल्या कपड्यांपासून ते दागिन्यापर्यंतची क्रेझ जगभरातील लोकांमध्ये पहायला मिळते. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या कलेक्शनने वेड लावले आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या लग्नात सब्यासाची यांनी डिझाईन केलेले वस्त्र परिधान केले होते.
सर्वात महागडे फॅशन डिझायनर असलेल्या सब्यसाची मुखर्जी यांनी केवळ सामाजिक भान जपण्यासाठी जैसलमेरमधील राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूलमधील विद्यार्थिनींसाठी गणवेश डिझाइन केलाय. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर निळ्या आणि 6चॉकलेटी रंगाचा विद्यार्थिनींसाठी डिझाइन केलेल्या गणवेशाचे फोटो पोस्ट केलेत.
सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेल्या या गणवेशावर खास राजस्थानी ‘अजरख’ पद्धतीने काम करण्यात आले आहे. सब्यसाची मुखर्जी यांनी हे अभियान अमेरिकेतील ‘सिटा’ (CITTA) या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हाती घेतले आहे. या अभियाचे मुख्य उदिष्ट्य म्हणजे वंचित मुलींना शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य प्रदान करणे हे आहे.