करोना संक्रमण काळात आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अनेक महिने थांबलेल्या गोष्टी आता ‘अनलॉक’ होऊ लागल्या आहेत. एस.टी. तसेच बसेस नंतर रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे तर प्रवाशांची चांगलीच सोय झाली आहे.
आता दसरा-दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने अनेकांनी आपापल्या गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. रेल्वेकडून सणासुदीसाठी स्पेशल ट्रेन्स सुरू झाले आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी काही नियम तयार केले आहेत. त्याबाबत जाणून घेतलेच पाहिजे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी रेल्वेचे नियम –
1. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क घालणे तसेच सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. मास्कशिवाय कुठल्याही प्रवाशाला रेल्वेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
2. प्रत्येक प्रवाशाने सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे अनिवार्य असेल.
3. करोना पॉझिटिव्ह रुग्णांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही. करोना रुग्ण असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रवाशांवर तात्काळ कारवाई केली जाईल.
4. जर एखाद्या प्रवाशाला करोनाची लक्षणे असल्यास त्याचा रिपोर्ट आल्याशिवाय त्याला प्रवास करता येणार नाही. अन्यथा कारवाई होईल.
5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या प्रवाशांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
6.रेल्वेमध्ये घाण केल्यास अथवा रेल्वे अस्वच्छ केल्यास, कचरा टाकल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.
7. रेल्वेचे नियम न पाळल्यास रेल्वे अधिनियम 1989 च्या 145, 153 आणि 154 कलमानुसार कारवाई केली जाणार आहे.