परिंचे -अतिवृष्टीमुळे परिंचे (ता. पुरंदर) परिसरातील कांबळवाडी, सटलवाडी परिसरातील शेतजमिनी, पाइपलाईन वाहून गेल्या असून व पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कांबळवाडी, सटलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेत जमीनीचे नुकसान झाले आहे.अनेक माती बंधारे फुटले आहेत. माती बांध, दगडाच्या ताली फुटून शेतजमीनीला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. परिसरातील विहिरी गाळाने भरून गेल्या असून विद्युत पंप गाडले गेले आहेत.
पाइपलाइन वाहून गेल्या शेतकरी बाळू जाधव यांनी सांगितले. परिसरात बाजरी, टॉमेटो, कोबी, कांदा, भुईमूग, सोयाबीन, ऊस जमीनदोस्त झाली आहेत. बाजरी व सोयाबीन काढणी अवस्थेत असून भुईसपाट झाली आहेत. यावर्षी टॉमेटो,कोबी, कांदा या पिकांना खर्च केला असून हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेल्याचे शेतकरी प्रकाश काळभोर यांनी सांगितले.
70 वर्षांत असा पाऊस कधीच पाहिला नसल्याचे शेतकरी कांतीलाल काळभोर यांनी सांगितले. दरम्यान, आमदार संजय जगताप यांनी पाहणी केली. यावेळी शामराव काळभोर, तानाजी काळभोर, सुभाष काळभोर, केशव काळभोर, जवाहरलाल काळभोर, शेतकरी उपस्थित होते.