पुणे – सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठीचे फेरफार कोणतेही कारण न सांगता लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तलाठी व मंडल अधिकारी यांना दिले होते. जिल्हाधिकारी यांनी हे आदेश देताच फेरफार निकाली निघण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात 34 हजार 494 फेरफार प्रकरणे प्रलंबित होते. जिल्हाधिकारी यांनी आढावा घेताच 15 दिवसात 18 हजार 237 फेरफर प्रकरणे विनासायास निकाली निघाली आहेत. जिल्हाधिकारी बोले प्रशासन हाले याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फेरफार प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वत: याबाबत पुढाकार घेत प्रलंबित असलेले फेरफार मुदतीमध्ये निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या. सुरुवातील फेरफार प्रलंबित असलेले तीन तालुके, तीन मंडल अधिकारी आणि तीन तलाठी यांच्याशी संवाद साधून अडचणी समजून घेत, फेरफार प्रलंबित ठेवू नका, वेळच्या वेळी फेरफार निकाली काढा, असे आदेश दिले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जिल्हात एकूण 34 हजार 494 प्रकरणे प्रलंबित होते. त्यापैकी 18 हजार 237 प्रकरणे निकाली निघाले असून, 16 हजार 257 प्रकरणे प्रलंबित आहेत. पुढील तीन आठवड्यात जास्तीत जास्त फेरफारची प्रकरणे निकाली निघाली पाहिजेत, याचे नियोजन करण्यात आले आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.