नवी दिल्ली -केंद्रीय मंत्र्यांबरोबरच्या बैठकीवेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारी भोजन नाकारले. त्याऐवजी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून आलेले अन्न खाणे पसंत केले.
केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये गुरूवारी पुन्हा चर्चा झाली. येथील विज्ञान भवनात काही काळ बैठक चालल्यानंतर लंच ब्रेक झाला. त्यावेळी शेतकरी नेत्यांसाठी सरकारी भोजन तयार ठेवण्यात आले. मात्र, ते खाण्यास शेतकरी नेत्यांनी स्पष्ट नकार दर्शवला. आमचे बांधव रस्त्यांवर ठिय्या मांडून असताना आम्ही सरकारी भोजन कसे काय स्वीकारू शकतो? भोजनाची व्यवस्था करून चांगले यजमान बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारने पेच सोडवण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली.
त्यांच्यासाठी सिंघू सीमेवरून एक व्हॅन जेवण घेऊन विज्ञान भवनात दाखल झाली. आंदोलनाचा भाग म्हणून शेतकरी आठ दिवसांपासून दिल्लीलगतच्या सिंघू आणि टिकरी सीमांवर मुक्काम ठोकून आहेत. याआधी शेतकरी नेत्यांनी सरकारी चहापानही नाकारले होते.