सविंदणे(प्रतिनिधी) – सविंदणे, कवठे येमाई, जांबुत, टाकळी हाजी, चांडोह, फाकटे, मलठण या गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नासाडी झाली आहे. टोमॅटो, बाजरी, ऊस, मका भुईसपाट झाले असून नवीन लावगड केलेला बटाटा सडून जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच मुसळधार पावसाने बंधारे, नाले फुटून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. सगळीकडेच पुर सदृश्य परिस्थिती होती.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1334684160204619/
या पुरामुळे व अर्धवट कामामुळे शिरूर- मंचर हा रस्ता बंद झाला आहे. या रस्त्याचे नवीन काम चालू असून अनेक ठिकाणी ठेकेदाराने खोदकाम करून ठेवलेले आहे. खोदकाम करून अनेक महिने उलटले तरी त्या ठिकाणी पुलाचे काम झाले नाही. त्यामुळे पावसाचे वाहणारे पाणी आसपास असणाऱ्या घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे इचके वाडी येथील संतोष रामदास इचके याच्या घरात पाणी शिरल्यामुळे घराच्या भिंतींना तडे गेले आहे. ठेकेदाराला वेळोवेळी सांगुन ही काम न केल्याने घराचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
तसेच काही शेतकऱ्यांनी नाल्याचे सांडवे बुजल्याने शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जावून शेतीचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्यातच ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.