- माजी आमदार तथा राष्ट्रवादी काॅँग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी दिले आदेश
कर्जत – गेल्या आठवड्यापासून राज्यात पडलेल्या परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यासह, रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार झालेल्या भाताच्या दाण्यास खाली पडल्यामुळे कोंब फुटले असून, कापणी केलेले भात शेतातच कुजले आहे. हजारो एकर मधील भातपिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, निसर्गाच्या या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला असून, त्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळावे, अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी नायब तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या चर्चा करताना जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी नुकसानग्रस्त शेतीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यात येऊन शासनातर्फे मदत करण्यात आली; परंतु त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही.
तसेच 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामध्ये अनेकांचे फळबागा, घरे पडली. वृक्षांचे जे नुकसान झाले, त्या संदर्भात किती निधी आला आणि आतापर्यंत किती जणांना वाटप केले याचा आढावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी घेतला असता, तर आतापर्यंत 5 कोटी 55 लाख निधी आला. त्यापैकी 5 कोटी 33 लाख नुकसानग्रस्त यांना दिला असून, उर्वरित लवकर जमा करणार असल्याचे तहसीदार विक्रम देशमुख यांनी माहिती दिली आहे.
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, माजी सभापती तानाजी चव्हाण, प्रतीक्षा लाड, युवक तालुकाध्यक्ष सागर शेळके, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, अमोघ कुलकर्णी, ऍड. प्रतीक्षा लाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शेतकरी वर्गाचे नवरात्र सण, तर अतिशय दुःखात गेला तर येणार दसरा आणि दिवाळी तरी साजरा करता आली पाहिजे. मध्येच करोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य आणि शेतकरीवर्गावर उपासमारीची वेळ आली, त्यात निसर्गचक्र आणि परतीच्या पावसाने जोरदार दणका दिल्यानंतर आता नुकसान भरपाई कधी मिळणार? याची चिंता बळीराजाला सतावतेय.
वर्षभर शेतात कष्ट केल्यानंतर शेतमाल हाती यायची वेळ आली असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. त्यामुळे कोकणामधील प्रमुख पीक भात असल्याने त्याचे नुकसान झाले आहे. भात पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्जमाफी नाही आणि त्यामुळे नवं कर्जही मिळत नाही.