नवी दिल्ली – शेतकऱ्यांशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या 35 संघटनांशी केंद्र सरकारची सुरू असलेल्या चर्चेतून मार्ग निघाला नाही. त्यामुळे दिल्लीतील कोंडी तातडीने फुटण्याची शक्यता धुसर आहे. शेतकऱ्यांची निदर्शने कडाक्याच्या थंडीतही सातव्या दिवशी सुरूच राहिली.
नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते ठाम आहेत. दिल्लीच्या सीमांवर केवळ ठिय्या दिला आहे, असे नव्हे तर दिल्ली-गाझियाबाद रस्त्यावर आपल्या जनावरांसहीत शेतकऱ्यांनी निदर्शने सुरू केली आहे.
शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारचा नवी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. केंद्रीय मंत्री आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या विज्ञान भवन येथे काल झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा इशाराही या नेत्यांनी दिला आहे. बैठकीचा पुढचा टप्पा उद्या (दि. 3) होणार आहे.
दिल्लीच्या सीमांवर ठाण कायम
देशाच्या राजधानीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कॉंक्रिटचे बॅरिकेड उभारण्यात आले आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवर शेकडो निदर्शक शेतकरी जमा झाले आहेत. उत्तर प्रदेशकडे दिल्लीतून जाणाऱ्या अनेक मार्गावर वाहतूक रोखण्यात आली आहे. दिल्ली आणि नोएडा या दोन्ही बाजूने अनेक स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ते निदर्शकांना दिल्लीकडे जाण्यापासून अडवत आहेत. तरीही गोठवणाऱ्या थंडीत शेतकरी ठाण मांडून बसले आहेत.
गुडगाव आणि झज्जर- बहादूरगढ या मार्गावरील वाहतूकही पोलिसांनी रोखून धरली आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीच कोंडी झाली आहे. त्यामुळे सिंघू आणि टिकरीसह शहरातील पाचही प्रवेशाचे प्रमुख मार्ग निदर्शनांमुळे बंद आहेत.
कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
पंजाबमधील 73 वर्षीय मोहिंदर कौर या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यांचा फोटो ट्विट करून या आजी शाहीन बाग आंदोलनातही होत्या. त्यांना 100 रुपये दिले की त्या आंदोलनात येतात, असे त्यात नमूद केले. प्रत्यक्षात कौर यांचे 13 एकर क्षेत्र असून त्या पतीच्या निधनानंतर शेती एकट्याच सांभाळतात. त्यांना अस्थम्याचा त्रास आहे. या ट्विटवर नेटकरी तुटून पडताच तिने हे ट्विट डिलीट केले. दरम्यान शाहीनबाग आंदोलनाने कंगनाने माफी मागावी म्हणून तिला कायदेशीर नोटीस बजावली.
कौर यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मला कोणी तरी सांगितल, एका नटीनं माझ्याविषयी असं लिहलंय. या नटमोगरीनं माझं घर बघितलं नाही. मी काय करते हे बघीतलं नाही. हे खूप चुकीचं आहे. मला काय करायचेत 100 रुपये. शेती करणं खूप अवघड आहे, हे मी अनुभवलंय. त्यामुळे मी आंदोलनात उतरले.