वॉशिंग्टन – भारत आणि चीनच्या सीमा रेषावरील गलवान खोऱ्यात झालेला रक्तरंजित संघर्ष हा अचानक घडलेला प्रकार नसून हे चीनने रचलेले षडयंत्र आहे, असा दावा अमेरिकेच्या उच्चस्तरीय कॉंग्रेस पॅनलने केला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले तर चिनी सैनिकही ठार झाले होते.
नुकताच अमेरिकेच्या कॉंग्रेस पॅनलचा यूनायटेड स्टेट-चायना इकोनॉमी अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनचा (USCC) वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. यात गलवान खोऱ्यातील भारत-चीनमधील झटापट आणि चीनचा कट असल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालामध्ये मिळालेले काही पुरावे गलवान खोऱ्यातील हिंस्र झटापट हा नियोजित कट असल्याकडे दिशानिर्देश करत आहेत, असे म्हटले आहे.
चीनने गलवान खोऱ्यात मोठया प्रमाणावर सैन्याची जमावजमव केली होती. घटनेच्या आठवडाभरआधीपासून जवळपास 1 हजार चिनी सैनिक तिथे होते. उपग्रह फोटोंच्या आधारे रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला. गलवान घटनेच्या दोन आठवडेआधी चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून तणाव वाढवण्याचे संकेत देण्यात आले होते.
भारत आणि चीनमधला तणाव अजूनही कायम आहे. दोन्ही बाजूचे 50 हजारच्या आसपास सैनिक पूर्व लडाख सीमेवर तैनात आहेत. रणगाडे, फायटर विमाने, क्षेपणास्त्र दोन्ही बाजूंनी सज्ज ठेवली आहेत. चीन मागे हटत नसल्याने अखेर भारतीय सैन्याने दक्षिण पॅंगॉंग किनाऱ्यावरच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. रणनितीक दृष्टीने भारताला त्यामुळे चीनवर वरचढ होता आले.