फादर फ्रान्सिस दिब्रिटो : महात्मा फुले समता पुरस्काराचे वितरण
पुणे – प्रभू येशू ख्रिस्ताचे मुक्तीचे तत्त्वज्ञान हीच महात्मा फुलेंची शिकवण होती. ईश्वराला निर्मिक असे संबोधणारे महात्मा फुले प्रभू येशू ख्रिस्ताचे कट्टर समर्थक होते. कारण जाती-धर्मापलीकडे जावून समतेचा विचार फुले दांपत्याने आचरणात आणला. द्वेषावर उभे असलेले समाजकारण आणि राजकारण टिकत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी आज आत्महत्या करतात, ही महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर बाब आहे. प्रजा भिकारी आणि राजा शिकारी अशी अवस्था झाली आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नव्या सरकारने प्राधान्याने योजना करावी. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे आपले ध्येय असले पाहिजे, असे मत 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले. पुरस्कार समारंभात ते बोलत होते.
महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या 129 व्या स्मृती दिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक दिब्रेटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पंकज भुजबळ, प्रा. हरी नरके, ज्येष्ठ उद्योजक दीपक कुदळे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ उपस्थित होते.
माझा राजकीय पुनर्जन्म केला
माझ्या अडचणीच्या काळात समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते हे माझ्या मागे उभे राहिले आणि मला आधार दिला. मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रचंड मतांनी पुन्हा आमदार केले. शरद पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देऊन, माझा राजकीय पुनर्जन्म केला असल्याचे मत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.