अलिगढ – दिल्लीच्या सीमांवर वर्षभर चाललेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांचे विविध कारणांनी निधन झाले. त्यांना शहीद दर्जा देण्याची ग्वाही सप-रालोद आघाडीने गुरूवारी दिली.
उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या सप आणि रालोदची संयुक्त सभा अलिगढमध्ये झाली. त्यामध्ये बोलताना राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) प्रमुख जयंत चौधरी यांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. उत्तरप्रदेशात आमच्या आघाडीचे सरकार आल्यास शहीद शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रूपयांची भरपाई देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवरून त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
शेतकऱ्यांचे लक्षणीय प्रमाण असलेल्या पश्चिम उत्तरप्रदेश विभागातील अलिगढमध्ये सभा घेऊन सप-रालोद आघाडीने त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन केले. त्या आंदोलनात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील शेतकरी सहभागी झाले होते. उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीत विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. त्या निवडणुकांमुळे शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांनाही राजकीय पक्ष महत्व देत आहेत.