नवी दिल्ली – एकिकडे सरकार आपल्या मागण्या मान्य करीत नाही, दुसरीकडे दिल्लीत थंडी आणि पावसाने कहर करीत हालअपेष्टांत वाढ केली आहे. तरीही अशा परिस्थितीत दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची लढण्याची जिद्द कायम असून कायदे रद्द झाल्या शिवाय येथून एकही शेतकरी हटण्यास तयार नसल्याचेच चित्र आज तेथे आहे. आज या आंदोलनला चाळीस दिवस होऊन गेले आहेत. इतके दिवस रस्त्यावर हालअपेष्टा सोसत ठामपणे उभे राहण्यातून शेतकऱ्यांचे मनोधैर्य अजिबात खचलेले नाही असेच दिसून आले आहे.
काल सोमवारी सरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची सातवी फेरी झाली पण ती फेरीही निष्फळ ठरली. आता पुन्हा दोन्ही बाजूंमध्ये 8 जानेवारीला चर्चा होणार आहे. पण त्यातूनही काही मार्ग निघण्याची शक्यता धूसर वाटत आहे. कृषी मंत्री तोमर यांनी पुढील फेरीत तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली असली तरी त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत असे विधान त्यांनी केल्याने कायदे रद्द करण्यास सरकारची तयारी नाही असेच ध्वनीत झाले आहे.
मध्यंतरी दिल्लीतील पारा एक अंशावर आला होता. या कडाक्याच्या थंडीतून शेतकरी थोडे सावरताहेत असे दिसत असतानाच दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून अचानक पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आणखी वाढले आहेत.
या हालाकिच्या स्थितीमुळे आजवर किमान 50 शेतकऱ्यांचा तिथे अंत झाला आहे. त्यातच दिल्लीतील करोनाच्या सावटाचाही धोका कायम आहे. असे असताना शेतकऱ्यांची लढण्याची जिगर मात्र जराही कमी झालेली नाही.