मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्याने आज लॉंग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे, अशी घोषणा शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी केली. आम्हाला सरकारने शिष्टमंडळ घेऊन बोलावले आणि आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. आमच्या 70 टक्के मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाण्यातील वासिंद येथे पत्रकार परिषदेत जे. पी. गावित बोलत होते. गावित म्हणाले, आमच्या बाकीच्या मागण्या विचाराधीन आहेत. इथे आलेल्या लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन मागे घ्यायचं की नाही हे ठरवले होते. बैठकीत जे निर्णय झाले, त्याची प्रत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. मागण्या मान्य झाल्याने मोर्चेकरी समाधानी आहेत. ज्या मागण्या विचाराधीन आहेत त्या येत्या काही दिवसांत नक्कीच पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिकहून निघालेला लॉंग मार्च ठाण्यात येताच शिंदे सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे विधानभवनात गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठकही पार पडली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली होती.
शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून ठाणे जिल्ह्यातील वासिंद येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूत्र हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचेही त्यांना आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, सात-बारा उतारा कोरा केला गेला पाहिजे, नुकसानी नंतर शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मिळाला पाहिजे, अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याची भरपाई मिळाली पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च नाशिकहून ठाण्यात दाखल झाला होता.