परभणी – भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशीही गारपीटसह जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या करंजखेड आणि पिशोर परिसरात गारपीट पाहायला मिळाली आहे. यासह लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात देखील आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतातील ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज आणि खरबूज यासह आंब्याच्या बागा असलेल्या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील गहू, ज्वारी, टरबूज यासह हरभरा हे पिके आता काढणीला आली होती. परंतु जोरदार झालेल्या गारपिटीमुळे शेतातील या पीकांना फटका बसला आहे.
परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळाला आहे. आज दुपारी दोन वाजेनंतर परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पुर्णा, सेलु तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला आहे. तर गंगाखेड, सेलु, सोनपेठ तालुक्यात गारपीट झाल्याने काढलेले आणि काढणीसाठी आलेल्या गहू, ज्वारी या पिकांसह टरबूज, खरबूज, आंबा, मोसंबी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, शुक्रवारी वीज कोसळून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील उखळी खूर्द येथील दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर सोनपेठ तालुक्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे.