पिंपळे गुरव, दि. 18 – नवी सांगवी, पिंपळे गुरव येथे पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य मार्गाने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने पदपथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात मागील काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. परंतु कारवाई थंड होताच पुन्हा व्यावसायिकांनी डोके वर काढून शहरातील पदपथ गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी तयार केलेले विस्तृत पदपथ व्यावसायिक बळकवत असताना महापालिका बघ्याची भूमिका घेत आहे. पदपथावरील अतिक्रमणामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
पिंपळे गुरव, नवी सांगवी आदी परिसरातील पदपथांवर सायंकाळच्या वेळी भाजीविक्रेते बसत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यांवर टेम्पो लावून भाजी विक्री करण्यात येत आहे. यात एम एस काटे चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, फेमस चौकांचा समावेश आहे. तसेच दुकानदारांकडून ठिकठिकाणी पदपथांवर कायमस्वरूपी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
वारंवार तक्रार करूनही मनपाचे अधिकारी जुजबी कारवाई करतात. नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली आहे. तरीही विक्रते रस्त्यावर आणि पदपथावर आपला व्यवसाय करत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमणावर कारवाई करावी.
– सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते.