पोलीसपाटील म्हणजे फिरता वारा… वाहता झरा… रात्री एकटाच अंधारात चमकणारा तारा… अंगावरील शहारा… रात्रीचा पहारा… सुख अन् दु:खाचा सहारा… जनहिताचा नारा…. अशाच एक पोलीसपाटलांची यशोगाथा आपण पाहणार आहोत. पोलीसपाटील असले तरी ते हाडाचे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या घामाला बळीराजाच्या रूपाने अन् सामान्यांना पोलीसपाटीलकीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करणारे खेड तालुक्यातील काळूस गावचे पोलीसपाटील रूपेश वसंत आरगडे.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या रुपेश यांना लहानपणापासूनच मातीचा “गंध’ अन् मातीतील कष्ट माहीत आहे. मात्र, या कष्टाला शिक्षणाची जोड मिळाली की स्वत:सह इतरांच्या आयुष्याला यशाची कलाटणी मिळते हे आपण जाणतोच. त्याचपद्धतीने रूपेश आरगडे हे उच्चशिक्षित असून ते संगणक अभियंते आहेत. मात्र, या शिक्षणाचा उपयोग केवळ शेतीसाठी आणि नागरिकांना व्हावा याचे “बाळकडू’ त्यांना घरातूनच मिळाले. अभियंता झाल्यावर त्यांनी 2013 मध्ये काळूस गावात “स्वीट कॉर्न’ प्रोसेसिंग युनिट उभारून शेतकऱ्यांना सधन होण्याची पायवाट दाखवून दिली. त्यामुळे सध्या खेडसह आसपासच्या तालुक्यात “मका’ पिकाचे क्षेत्र वाढले आहे. तर शेतकऱ्यांच्या खिशातही दोन पैसे जादा मिळत आहेत.
त्यांच्या प्रोसेसिंग युनिटमधील “स्वीट कॉर्न’ला देशासह परदेशात मागणी आहे. या युनिटमधून त्यांनी केवळ शेतकऱ्यांसोबत आसपासच्या परिसरातील सुमारे 150 ते 200 लोकांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. त्यांनी “कृषीरत्न कॉर्न ब्रॅंड’चे कॉपीराईट हक्कही घेतले असल्याने शेतकऱ्यांसाठी तो मोठा आधार ठरला आहे.
या मका पिकाचा पालापाचोळाही वाया न जाऊ देता तो परिसरातील दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना दिला जात असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला आहे, त्यामुळे परिसरातील मका उत्पादकासह दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्याच्या दुधाला देखील दाम मिळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी नवनवीन कल्पनांची जोड देण्यासाठी आरगडे झटत आहेत. त्यामुळे रूपेश आरगडे हे प्रगतशील शेतकरी म्हणून बळीराजासाठी आणि पोलीसपाटीलकीच्या रूपाने सामान्य नागरिकांचे खरे “आधारवड’ ठरत आहेत.
करोना महामारीच्या काळात पोलीसपाटील “योद्धा’ म्हणून पुढे आले. काळूस गावात पोलीसपाटीलपद रिक्त होते, तर गावात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने जुलै महिन्यात रुपेश आरगडे यांची पोलीसपाटील म्हणून नियुक्ती केली आणि त्यांनी लागलीच पदभार स्वीकारत गावातील नागरिकांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू केले. तर तेव्हापासून आजपर्यंत ते करोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी दिवस-रात्र एक करीत आहेत.
पोलीसपाटील म्हणजे नागरिक आणि प्रशासनातील महत्त्वाचा दुवा. कायद्यात तरतूद असलेल्या कामांबरोबरच गावातील सण, उत्सव, यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर पोलीसपाटील लक्ष ठेवून असतात. रूपेश आरगडे यांना पद मिळाले त्यावेळची परिस्थिती अत्यंत बिकट होती. एकीकडे करोनाचा कहर थांबवण्याचे आणि दुसरीकडे नागरिकांना मानसिक आधार देण्याचे आव्हान. या आव्हानाला आरगडे न डगमगता किंवा आपणास याचा अनुभव नसल्याचा जरादेखील “लवलेश’ न दाखवता थेट मैदानात लढाईला उतरले आणि नागरिकांच्या मदतीने करोनाला हद्दपार करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.
-करोना काळात
-आरगडे यांचे कार्य
-नागरिकांना मानसिकदृष्ट्या कणखर केले
-करोनाबाधितांच्या घरातील इतरांना तपासणीसाठी तयार करणे
-बाहेरगावातून आलेल्यांना विलगीकरणासाठी तयार करणे
-गरजूंना व ज्येष्ठांना अत्यावश्यक सेवा घरपोच मिळावा यासाठी प्रयत्न
-गावात सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्यांना मदत करणे
-घरोघरी जाऊन करोनाबाबत जनजागृतीसोबत मास्क, सॅनिटायझर, व्हिटॅमीनच्या गोळ्या, साबण वाटप करणे
शब्दांकन : सुनील थिगळे
दावडी (ता. खेड)