देवळालीतील बैठकीत निर्णय ः राहुरीत तहसीलदार यांना निवेदन
राहुरी / राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यात 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यानंतर राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जनता कर्फ्यू पाळण्यास विरोध दर्शविण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन देण्यात आले. राहुरीतही तहसीलदारांना निवेदन देऊन बंदला विरोध करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम होते. नगरसेवक आदिनाथ कराळे, सचिन ढूस, अमोल कदम, प्रकाश संसारे उपस्थित होते. यावेळी आठवड्याचा जनता कर्फ्यू आम्ही पाळू शकत नाही. मागील चार महिन्यांसाठी घेतलेले कर्ज फिटता फिटत नाही. गाळाभाडेही थकलेले आहे. व्यवसाय करणे जिकरीचे झालेले आहे. आम्ही सोशल डिस्टन्सचे पालन करून ग्राहकांना सेवा देतो. त्यामुळे आम्हाला दुकाने बंद ठेवणे परवडणार नाही. त्यामुळे बंद पाळण्यास आमचा विरोध आहे, असा सूर उपस्थित व्यापाऱ्यांनी आळवला. चर्चेत फारूक देशमुख, जहीर शेख, डॉ. सुनील कदम, रवी छाजेड, आबा वाळुंज, संदीप कदम, सचिन ढूस, पंकज वाळुंज, किशोर पंडित आदींनी सहभाग घेतला. यावेळी नगराध्यक्ष कदम व मुख्याधिकारी अजित निकत यांना बंद न पाळण्याचे निवेदन देण्यात आले.
राहुरी शहरात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मागील पाच महिन्यांपासून करोनाच्या भयंकर महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक, रिक्षावाले, भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यावसायिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे करोना महामारीला सोबत घेऊन जगायला शिकावे लागेल. अन्यथा गरीब जनता भूकबळी ठरेल. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे. निवेदनावर सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाबासाहेब साठे, अनिल जाधव, नबी शेख, बॉबी साळवे, कल्याण जगधने, देवदान गायकवाड, अरुण पवार, मोहम्मद ईराणी, मकबूल इनामदार, सचिन साळवे, गणेश पवार, बाबासाहेब मकासरे, पिंटू साळवे, संदीप गायकवाड आदींच्या सह्या आहेत.