बीड – नांदेड जिल्हा सोडला तर मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही अपेक्षित पाऊस पडला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबादसह औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
तर बियाणे न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात येत असून, त्यानुसार पंचनामे देखील करण्यास सुरुवात झाली आहे. ज्यात औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील पुरवठा झालेल्या खतांचे नऊ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे.
लातूर जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या 220 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल झाल्या आहेत, बीडच्या अंबाजोगाईतील 60 तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील 36 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.