हिंगोली – जिल्ह्यात काल रात्रीपासून ढगाळ वातावरण असून ७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यात विविध भागात ७ मार्च रोजी भल्या पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत होता. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, डोंगरकडा, जवळा पांचाळ, आखाडा बाळापूर, रामेश्वर तांडा परिसरात रिमझिम पाऊस पडला. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आंबा संत्री मोसंबी व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औंढा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. हिंगोली तालुक्यातील विविध भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. हिंगोलीत सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली होती. सेनगाव तालुक्यातील साखरा येथील शेतकऱ्यांचे हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. या ढगाळ वातावरण असताना मंगळवार रोजी सकाळी ९ च्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. शिंदेवाडी येथील पिंटू गव्हाने हे स्वताच्या शेतात मंगळवारी सकाळी ९ च्या सूमारास हरबरा झाकण्यासाठी जात असताना अचानक विजेच्या कडकडाटात जोरात पावसाला सुरुवात झाली. सकाळी अचानक पाऊस येऊ लागल्याने ते झाडाखाली थांबताच अंगावर वीज कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रिसोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
विलास पिंटू गव्हाने वय (३९) मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेतामध्ये जात असताना हि दूर्देवी घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाच्छात आई, वडील, भाऊ, पत्नी मूले ,मूली असा परिवार आहे.