कान्हे , दि. 9- गेले दोन वर्ष करोनाचा काळ असल्यामुळे मिरवणुका काढण्यास निर्बंध होते ;मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मोठ्या उत्साहाने व आनंदाने ढोल ताशाच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत आणि भक्तीपूर्ण विराजमान झालेल्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात नागरिकांनी जड अंतकरणाने इंद्रायणी नदीच्या काठावर विसर्जन केले. मंडळांचे बाप्पा अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ घोषणांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.
काही मंडळांचे बाप्पा गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जित करण्यात आले. कान्हे येथील भैरवनाथ मित्र मंडळ ओकार मित्र मंडळ तर नायगाव येथील दत्त गुरु मित्र मंडळ वयेवलेवाडी येथील राजे ग्रुप मित्र मंडळ कामशेत मंडळाच्या गणपतीची विसर्जनाची मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल ताशा लेझीम,डिजे या पारंपारिक वाद्याच्या तालावर बापाच्या नामाचा घोष करत तरुण लहान थोर सर्वजन भक्तिमय वातावरणात बुडाले होते. बापाला निरोप देताना सर्वांनाच गहिवरून आले होते. काही ठिकाणी रथ वाहने सजून तर काही ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ; तर काही ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक सुरु होती. तर काही ठिकाणी गुलाल व डीजे वाजवीत मिरवणूक। काढल्याचे पाहायला मिळाली. भावपूर्ण व उत्साही वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात सुमारे दोन ते तीन तास मिरवणूक काढण्यात आली होती. गणरायाच्या मूर्ती इंद्रायणी नदीमध्ये विसर्जित करण्यात आल्या .