पिंपरी, दि. 11 – कौटुंबिक हिंसा नात्यांचा बळी घेत आहे. घरातील कलह न्यायालयापर्यंत आल्याने घरातील अन्य सदस्यांची परवड होते. नातेसंबंध टिकवून आदर्श कुटुंब पद्धतीची वीण घालायला हवी, यावर भाष्य करणारे पथनाट्य राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पिंपरी न्यायालयाच्या प्रांगणात सादर केले.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी आणि पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 11) लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त भोसरी येथील राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पिंपरी न्यायालय परिसरात कौटुंबिक हिंसाचारावर भाष्य करणारे पथनाट्य सादर केले.
यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर एस वानखेडे, आर एम गिरी, एन आर गजभिये, पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ऍड. जयश्री कुटे, सचिव ऍड. गणेश शिंदे, महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे, सह सचिव ऍड.मंगेश नढे, खजिनदार ऍड. विश्वेश्वर काळजे, हिशोब तपासणीस ऍड. राजेश रणपिसे, सदस्य ऍड. अक्षय केदार, ऍड. स्वप्नील वाळुंज, ऍड. सौरभ जगताप, ऍड. नितीन पवार, ऍड. प्रशांत बचुटे, ऍड. पवन गायकवाड, तसेच ऍड. पदमावती पाटील, राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या शिक्षिका ऍड. पूजा शिंदे आदी उपस्थित होते.
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सुप्रिया हराळ, अपूर्वा वातकर, प्रतीक्षा पाटील, आदिती निटुरे, रेणू जरे, स्वप्नाली गायकवाड यांनी पथनाट्य सादर केले. पत्नीला सासरच्यांकडून होणारा त्रास, पतीला पत्नी आणि तिच्या माहेरच्यांकडून होणारा त्रास, सासू-सासऱ्यांना सुनेकडून होणारा त्रास आणि पती-पत्नीकडून पतीच्या आई-वडील व कुटुंबियांना होणारा त्रास; अशा चार प्रकारचे कौटुंबिक हिंसाचार पथनाट्यात सादर करण्यात आले. कौटुंबिक हिंसाचाराचे कुटुंबातील सदस्यांवर होणारे परिणाम तसेच कुटुंबातील हिंसा नात्यांचा बळी घेत असल्याने प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असा संदेश पथनाट्यातून प्रभावीपणे देण्यात आला.