पिंपरी, दि. 11 – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण येत होता. परंतु आता कर्मचाऱ्यांमध्ये आपसात वादाची स्थिती निर्माण झाली आहे. जमादाराकडून आवश्यक कामांसाठी चतुर्थ श्रेणीतील कामगार दिले जात नसून नाहक त्रास दिला जात असल्याचा आक्षेप रुग्णालयातील कर्मचारी करत आहेत. तर कर्मचारी कमी आहेत, जेवढे लोक आहेत तेवढ्यातच कामे करुन घेत असल्याचे स्पष्टीकरण जमादाराकडून देण्यात आले आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जमादारावर गैरहजेरी लावणे, रुग्णांच्या सेवेसाठी चतुर्थ श्रेणीतील कामगार न देणे, कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलणे, असे आक्षेप घेतले आहेत. तसेच याबाबत वारंवार तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी पाठिशी घालत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मनमानी कारभार करणाऱ्या या जमादाराला चाप बसणार कधी, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत.
रुग्णालयातील वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना विविध कारणांसाठी बाहेर ये-जा करावी लागते. एक्सरे, तपासणी करण्यासाठी इतर वॉर्डमध्ये जावे लागते. त्यांना घेऊन जाण्यासाठी चतुर्थ श्रेणीतील कामगारांची नियुक्ती केली जाते. मात्र हे कामगार जमादाराच्या सूचनेनुसार काम करतात. जमादार नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने कामगारच देत नसल्याचे सांगून उद्धट उत्तरे देत असल्याच्या तक्रारी परिचारिका करत आहेत. कामगारच कमी असल्याची कारणे दिली जात आहे.
दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या समस्या निर्माण होत असल्याचे जमादाराकडून सांगण्यात येत आहे. कर्मचारीच कमी असतील तर कामासाठी कसे पाठवू, असा प्रश्न जमादार उपस्थित करत आहे. कर्मचारी कमी असल्यास त्या बाबत तोडगा वरिष्ठांकडून काढला जातो, असेही जमादारकडून सांगण्यात येत आहे.
परिचारिकांकडून बदलीसाठी पत्र
रुग्णालयातील जमादाराची उद्धट वागणूक असल्याने त्यांची बदली करावी, अशी मागणी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांना त्या बाबत निवेदन दिले आहे. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती परिचारिकांनी दिली.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. जेवढे लोक आहेत तेवढ्यामध्ये काम करून घेतली जात आहेत. कमी लोक असल्यानंतर या समस्या येत आहेत. मला वरिष्ठांकडून कर्मचारी दिल्यासच मी पुढील कामासाठी देतो. त्यामुळे हे वरिष्ठांच्या हातात आहे.
– ज्ञानेश्वर पाटोळे, सहायक जमादार, जिल्हा रुग्णालय, नवी सांगवी