Odisha Train Accident | ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशाने गेल्या काही दशकांत पाहिलेल्या अपघातांपैकी हा सर्वाधिक भयानक अपघात होता असं या अपघाताचं वर्णन करण्यात येतंय. प्रवासासाठी निघालेली कुटुंबच्या-कुटुंब या अपघातात उजाडली आहेत. अपघातानंतर रुळावर पडलेल्या रेल्वे डब्ब्यांच्या उध्वस्त झालेल्या सांगाड्यांमध्ये नातेवाईक आपल्या कुटुंबीयांचा शोध घेतानाही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. कोणाचा मुलगा, कोणाची आई तर कोणाचा बाप… रक्ताच्या थारोळ्यातून वाट काढत अपघातग्रस्तांचा शोध सुरूच आहे…
या रेल्वे अपघातात, पश्चिम बंगालचं एक कुटुंब सुखरूप बचावलंय. सुब्रतो पाल, देबोश्री पाल आणि त्यांचा मुलगा हे पश्चिम बंगालमधील महिसादल, पूर्व मेदिनीपूर येथील मालुबासन गावचे रहिवासी आहेत. नवरा-बायको आपल्या मुलाच्या उपचारासाठी चेन्नईला निघाले होते. मात्र नियतीने पुढं काय वाढून ठेवलं होत याचा किंचीतसाही अंदाज त्यांना नव्हता.
“आम्ही खरगपूर येथून चैन्नईसाठी ट्रेन पकडली. बालासुर रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर थोडाच वेळात मोठा धक्का बसल्याच जाणवलं. जेव्हा डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर फक्त अंधार होता. सर्वत्र धूर पसरलेला.” सुब्रतो पाल सांगतात.
या अपघातातून बचावलेल्या देबोश्री पाल आपल्याला दुसरा जन्मचं मिळाल्याचं सांगतात. या भीषण अपघाताची ही दृश्य आयुष्यभर डोळ्यासमोरून जाणार नाहीत असंही त्या म्हणतात. “आम्ही चेन्नईला आमच्या मुलाच्या इलाजासाठी डॉक्टरांना भेटायला निघालो होतो. बालासोर ओलांडल्यानंतर अपघात झाला. आम्हाला काही समजलंच नाही. लोकं एकमेकांवर पडली होती. आम्हाला आमचा मुलगा सापडत नव्हता. आम्ही कसे जगलो ते माहित नाही पण आमच्यासाठी हे दुसरे जीवन आहे. मी जिवंत असेपर्यंत, ही दृश्यं माझ्या मनातून कधीही जाणार नाहीत.”
या भयावह अपघातात, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी या तीन रेल्वेगाडया एकमेकांवर आदळल्या. ओडिशामधील भुवनेश्वर येथील विशेष मदत आयुक्तांच्या राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने शनिवारी जारी केलेल्या प्राथमिक अहवालानुसार ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्टेशनवर सकाळी ७ वाजता हा अपघात झाला.